पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यातील गारवा मनाला सुखद वाटत असला, तरी या दिवसांत बुरशीजन्य संसर्गाचा (Fungal Infection) धोका कमालीचा वाढतो.
हवेतील आर्द्रता, ओले कपडे, अंगाला येणारा घाम आणि त्वचा दीर्घकाळ ओलसर राहणे यामुळे बुरशीची वाढ वेगाने होते.
या ऋतूमध्ये अनेकांना गजकर्ण (Ringworm), तीव्र खाज आणि पायांना होणारा 'ॲथलीट्स फूट' (Athlete's foot) यांसारख्या समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागते.
त्वचेवर लाल पुरळ येणे, शरीरावर तीव्र खाज सुटणे आणि अंगाची जळजळ होणे ही बुरशीजन्य संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत.
त्वचेची सालपटे निघणे, शरीरावर गोल आकाराचे पुरळ किंवा मुरुमे येणे यांमुळे त्वचा खराब आणि वेदनादायी होऊ शकते.
पावसाच्या पाण्यामुळे पायाच्या बोटांमधील त्वचा पांढरी पडणे किंवा पायांना भेगा पडणे असा त्रास जाणवू लागतो, याकडे दुर्लक्ष करू नका.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात जास्त वेळ ओले कपडे घालून राहणे टाळा. ओल्या कपड्यांमुळे त्वचेवर ओलावा टिकून राहतो आणि बुरशी झपाट्याने वाढते.
पावसाळ्यामध्ये घट्ट आणि खूप जाड कपडे घालणे टाळले पाहिजे. घट्ट कपड्यांमुळे हवा खेळती राहत नाही आणि संसर्गाचा धोका दुप्पट होतो.
बुरशीजन्य संसर्गापासून नैसर्गिक रित्या बचाव करण्यासाठी खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून त्याने शरीराला मालिश करणे फायदेशीर ठरते.
त्वचेची स्वच्छता राखा आणि संसर्गाची लक्षणे तीव्र झाल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.