पुढारी वृत्तसेवा
शॅम्पूचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ साध्या पाण्याने केस धुणे केसांसाठी फायदेशीर आहे का? यावर तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, केवळ पाण्याने केस धुतल्यास वरवरची धूळ-माती निघून जाऊ शकते, परंतु केसांच्या मुळाशी जमा होणारे अतिरिक्त तेल आणि चिकटपणा पूर्णपणे साफ होत नाही.
तेल आणि पाणी एकत्र विरघळत नसल्यामुळे टाळूवर चिकटपणा कायम राहतो, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
शॅम्पू न वापरल्याने टाळूवरील नैसर्गिक तेल टिकून राहतात, ज्यामुळे कोरडेपणा कमी होतो. मात्र, याची दुसरी बाजू अशी की, केवळ पाण्याने तेलकटपणा किंवा तेल काढून टाकता येत नाही.
नैसर्गिक तेल आणि केसांच्या उत्पादनांमधील रसायनांचे अंश केवळ पाण्याने धुतले जात नाहीत; त्यासाठी शॅम्पूची गरज असते.
केवळ पाण्याने केस धुण्याचे फायदे
'हिम्स' या हेल्थकेयर रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, शॅम्पूमध्ये आढळणारे सल्फेट आणि पॅराबेन्ससारखे कडक केमिकल्स केसांच्या संपर्कात येत नाहीत.
जास्त शॅम्पू केल्याने केस कोरडे होतात. केवळ पाण्याने धुण्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
तोटे काय?
केवळ पाण्याचा वापर केल्यास केसांमधील तेल न निघाल्याने टाळूवरील छिद्रे बंद होऊ शकतात. यामुळे टाळूवर घाण साचते, ज्यामुळे कोंडा होणे, तीव्र खाज सुटणे आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांचा सल्ला
शॅम्पू पूर्णपणे बंद करू नका, आठवड्यातून १ किंवा २ वेळा सौम्य किंवा सल्फेट-फ्री शॅम्पूचा वापर करावा. तर उर्वरित दिवसांमध्ये केवळ साध्या पाण्याने धुवू शकता.