पुढारी वृत्तसेवा
बहुतेकांना वाटते की, अस्थमा म्हणजेच दमा हा फक्त थंडीच्या दिवसांतच जास्त त्रास देतो.
मात्र, तज्ज्ञांच्या मते, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. वाढते तापमान, प्रदूषण आणि वातावरणातील बदल, यामुळे उन्हाळ्यातही अस्थमा अटॅकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
उन्हाळ्यात हवेत ओझोन आणि सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढते.
हे घटक श्वसनमार्गांना त्रास देतात आणि त्यामध्ये सूज वाढवतात.
त्याशिवाय, उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) होऊ शकते, ज्यामुळे श्वसनमार्गातील म्युकस घट्ट होतो आणि श्वास घेणे अधिक कठीण होते.
दमट हवामान (ह्युमिडिटी) देखील अस्थमा रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते; कारण त्यामुळे श्वसनमार्ग अधिक संवेदनशील होतात.
याशिवाय, सतत उष्णतेत राहिल्यामुळे थकवा, उष्माघात आणि इलेक्ट्रोलाईट असंतुलन यासारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्याचा थेट परिणाम श्वसनावर होतो.
त्यामुळेच तज्ज्ञांच्या मते, अस्थमा रुग्णांनी उन्हाळ्यातही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे.