पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ऐतिहासिक ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. आता रोहितसेनेचे लक्ष्य बांगलादेशचा सफाया करण्यावर असेल. दरम्यान, विराट कोहलीही या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फारशा धावा झाल्या नाहीत, पण आता त्याने दुसऱ्या सामन्यात धावा कण्यासाठी कंबर कसली आहे. जर त्याच्या बॅटमधून धावा झाल्या तर तो नवा टप्पा गाठेल.
कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 26 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आता तो 27 हजार धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत जगभरातील केवळ तीन फलंदाजांना 27 हजार धावांचा टप्पा पार करता आला आहे. यात सचिन तेंडुलकर पहिल्या, श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या आणि रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर विराट कोहलीने आणखी 35 धावा केल्या तर तो 27 हजारांचा आकडा गाठणार आहे.
कोहलीने आतापर्यंत 114 कसोटीत 8,871 धावा केल्या आहेत. तर त्याने 295 वनडे सामने खेळले असून यात 13,906 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीही बॅट तळपली आहे. या फॉरमॅटममध्ये त्याने 125 सामने खेळून 4188 धावा केल्या आहेत. अशा एकूण 534 सामन्यांच्या 593 डावांमध्ये कोहलीच्या नावावर 26,965 धावा जमा झाल्या आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने 6 चेंडूत 6 धावा आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. या सुमार कामगिरीने चाहत्यांची निराशा झाली. आता कानपूर मैदानावर तो कसा खेळतो याकडे नजरा लागल्या आहेत. कारण ग्रीन पार्क मैदानावरील कोहलीची आकडेवारी फारशी चांगली नाही. या मैदानावर तो 2016 मध्ये पहिली कसोटी खेळला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ समोर होता. त्या कसोतीत कोहलीला पहिल्या डावात केवळ 9 तर दुसऱ्या डावात केवळ 18 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत, कानपूरमधील त्याचे चाहते कोहलीच्या मोठ्या खेळीची वाट पाहत आहे.