भूकंप आणि हादरे (Pudhari File Photo)
संपादकीय

Political Mindset | भूकंप आणि हादरे

आपले महाराष्ट्र राज्य असो की, संपूर्ण देश असो, काही लोकांचा पूर्णवेळ व्यवसाय राजकारण हाच असतो.

पुढारी वृत्तसेवा

आपले महाराष्ट्र राज्य असो की, संपूर्ण देश असो, काही लोकांचा पूर्णवेळ व्यवसाय राजकारण हाच असतो. निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग येत असतो. सर्वात जास्त चुरस विधानसभा निवडणुकांच्या वेळेस असते. त्यापाठोपाठ खासदारकीच्या निवडणुका चुरशीच्या होतात. सर्वाधिक चुरस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असते. इथे ना कोणत्या तत्त्वाचा विषय असतो, ना कोणत्या विचारधारेचा विषय असतो. जशी संधी मिळेल तसे राजकारण करत जाणे हेच राजकीय लोकांचे ध्येय असते.

येणार्‍या काळामध्ये अमुक पक्षामध्ये भूकंप झाला, तमुक पक्षाला खिंडार पडले आणि कोणत्या तिसर्‍याच पक्षाला मोठा धक्का बसला, अशा बातम्या तुमच्या पाहण्यात येणार आहेत. राजकीय भूकंप म्हणजे वर्षानुवर्षे एखाद्या पक्षात काम करणारा एखादा नेता निवडणूक तोंडावर असताना आपल्या कार्यकर्त्यांसह दुसर्‍या पक्षात जाहीर प्रवेश करतो. प्रत्येक पक्षाच्या राज्य पातळीवरील प्रदेशाध्यक्षांना सध्या आलेल्या लोकांचे स्वागत करणे एवढे एक महत्त्वाचे काम असते. जो पक्षांतर करत आहे तो स्वतःविषयीच्या बातम्या सर्वत्र येतील याची पुरेशी काळजी घेऊन असतो. पत्रकार मंडळीही लेखणी घेऊन सज्ज असतात.

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा हजारो कार्यकर्त्यांसह अमुकतमुक पक्षात प्रवेश, अशी ती बातमी असते. प्रत्यक्ष कार्यकर्ते जेमतेम 50 ते 60 असतात; पण एकेक कार्यकर्ता 100 कार्यकर्त्यांच्या बळाचा धरला तर मग ते हजारो होतात. सध्याच्या पक्षात आपली कशी घुसमट होत होती, त्या पक्षात लोकशाही कशी नाही, त्या पक्षाने आपल्यावर वर्षानुवर्षे अन्याय केला, अशाप्रकारचे आरोप करत वाजत-गाजत लोक दुसर्‍या पक्षात जातात. मंडळी, खरे पाहता हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानले पाहिजे. लोकशाही आली की, निवडणुका आल्या आणि निवडणूक आली की, पक्षांतर आलेच, हे ठरलेच आहे. ज्या पक्षातून असे काही 50 ते 100 लोक दुसर्‍या पक्षात जातात तिथे भूकंप वगैरे काही होत नसतो. भूकंप हा शब्द पत्रकार मंडळींनी प्लॉट केलेला आहे.

आयाराम-गयाराम प्रवृत्ती सर्व पक्षांना आता सवयीची झाली आहे. कुणी गेल्याचे वाईट वाटत नाही आणि कुणी आल्याचे फारसे सुख नसते, अशा निर्विकार भावनेने प्रदेशाध्यक्ष लोकांना आपल्या पक्षात घेत असतात आणि जाणार्‍यांना जाऊ देत असतात.

खिंडार पडले या शब्दाचीही आम्हाला अशीच गंमत वाटते. एखादी मजबूत भिंत आहे आणि तिला खिंडार पडल्यानंतर अलीकडून पलीकडे जाता येते. फुटकळ कार्यकर्ते इकडून तिकडे गेल्यानंतर पक्षाला खिंडार कसले साधा ओरखडासुद्धा पडत नाही; पण अमुकतमुक पक्षाला खिंडार पडले, असे म्हणण्याची पद्धत आहे. येते तीन महिने आता तुम्ही या शब्दांचा सराव करून घ्यायला पाहिजे; कारण हे शब्द सातत्याने तुमच्या कानावर पडणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT