नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान मोदी शनिवारी (दि.10) वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त स्थळांना भेट देणार आहेत. ३० जुलै रोजी वायनाडच्या चूरलमाला आणि मुंडक्काईला येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला वायनाडमधील भूस्खलन राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे.
संसदेच्या अधिवेशनातही वायनाडमधील भूस्खलनाचा मुद्दा चर्चेला आला होता. दरम्यान, काँग्रेस नेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही यापूर्वी वायनाडचा दौरा केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.