नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज नमुद केला. यामध्ये त्यांनी अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाऐवजी नवे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी करत असेलेले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्यासमोर हे प्रकरण नमुद करण्यात आले असुन या अर्जावर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२४ मध्ये दिला होता. या निकालानुसार अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानून त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. त्यानंतर या निकालाविरुद्ध शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली नाही. मात्र हे सांगितले की आम्ही निर्णय देईपर्यंत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह वापरू शकेल.
दरम्यान, शरद पवार गट नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतो. त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. निवडणूक आयोगाने त्यांना 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आले. पुढे लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गट घड्याळ चिन्ह वापरत असताना त्याखाली 'हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे' असे लिहिण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या मुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी १२ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी एक अर्ज नमूद करून घेतला. (Sharad Pawar vs Ajit Pawar)
न्यायालयात नमूद केलेल्या अर्जात सिंघवी म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. आम्हाला तुतारी हे चिन्ह मिळाले असले तरी अजूनही लोकांना संभ्रम आहे. त्यामुळे अंतिम निर्णय येईल त्याला वेळही लागू शकतो. लोकांना संभ्रम राहु नये, म्हणून अजित पवारांना घड्याळाऐवजी नवे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, शरद पवार गटाने अर्ज दाखल केला आहे. यावर येत्या २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय शरद पवार गटाचे म्हणणे ऐकून घेईल. मात्र त्यांच्या मागणीनुसार काही होऊ शकेल, अशी शक्यता कमीच आहे.