नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात विरोधक बेछूट आरोप करत सुटले आहेत. याबाबत तपास होणार आहे. बंदूक नेमकी कोणती होती, कशी चालली, या सगळ्या बाबी त्यामधून उलगडतील, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. दिल्लीत त्या माध्यमांशी बोलत होत्या. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक याचिका न्यायालयीन विषय आहे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाबद्दल बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाले की, ‘या प्रकरणात लोकांच्या भावना तीव्र होत्या. अनेक लोक अनेक प्रश्न उपस्थित करत होते. काही दिवसांपूर्वी बदलापूर प्रकरणातील पीडित एका मुलीच्या पालकांनाही मी भेटले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून कुठलाही तपशील नाहीत नसताना काही लोक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस यांच्यावर राजकारणासाठी टीका करत आहेत. या प्रकरणात एक पोलिस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने स्वतःला जखमी करण्याची घटना यापूर्वी घडलेली नाही. त्यामुळे यामध्ये कोणाला लपवण्यासाठी काही करण्यात आले, असे मला वाटत नाही. पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळी झाडावी लागली, चौकशीचा अहवाल आल्याशिवाय कोणाही कुठल्याही निष्कर्ष पर्यंत जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, बदलापूर प्रकरणी दाखल केलेला खटला मागे न घेणारा खटला आहे. तो आरोपी गेला म्हणून बाकी आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणातील सर्व मुद्दे चार्जशीटमध्ये आले आहेत. मात्र विरोधकांची भूमिका ही निवडणुकीत फायदा उचलणारी दिसत आहे, असाही आरोप त्यांनी केला.