पुढारी ऑनलाईन डेस्क : सुसाट वेगाला कर्णकर्कश आवाज जोड देत दुचाकी पळवणारे देशातील बहुतांश शहरांमध्ये दिसतात. अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांनी दुचाकीच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढत उच्छाद मांडलेलाही दिसतो. अशाच हुल्लडबाज तरुणाईवर धडक कारवाई मध्य प्रदेशमधील इंदूर पोलिसांनी केली आहे. एक दोन नव्हे तब्बल १००० हून अधिक दुचाकींचे मॉडीफाय सायलेन्सर बुलडोझारने नष्ट करण्यात आल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, इंदूर शहरात मॉडीफाय सायलेन्सरविरोधात कारवाई मागील काही काळापासून सुरु आहे. या कारवाई अंतर्गत शहरातील असंख्य दुचाकीस्वारांना दंड करण्यात आले. तसेच मॉडीफाय सारलेन्सरही जप्त करण्यात आले होते. अखेर दुचाकीने गोंगट माजवणार्यांना चाप बसवण्यासाठी वाहतूक निरीक्षक रेखा सिंग यांनी जप्त केलेले मॉफीडाय सायलेन्सर नष्ट करण्यासाठी त्यावर बुलडोझर चालवला.
पोलिस उपायुक्त (वाहतूक) अरविंद तिवारी यांनी सांगितले की, "मॉडिफाईड बाईक सायलेन्सरचा मुद्दा थेट महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही तडजोड मान्य करण्यात येणार नाही. बाईक सायलेंसर फटाक्यासारखे आवाज सोडतात, ज्यामुळे सुरक्षिततेला धोका निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. याविराधता आम्ही सुरुवातीपासून मोहीम राबवत आहोत. आतापर्यंत 2,000 हून अधिक बाइक्सना दंड ठोठावला आहे. शिवाय, आम्ही असंख्य बदल केलेले सायलेन्सर जप्त केले आहेत आणि आज त्यापैकी 1,000 हून अधिक नष्ट करण्यात आले."
गेल्या महिन्यात, इंदूर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर वापरून सुमारे 350 सुधारित सायलेन्सर नष्ट केले होते. अशा सायलेन्सरच्या वापरामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला असून ते दूर करण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचाही अधिकार्यांनी स्पष्ट केले.