गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथे रविवारी वादळीवारा आणि विजेच्या कडकटासह मुसळधार पाऊस झाला. या वेळी झालेल्या पावसादरम्यान पोल्ट्रीवर वीज पडल्याणने पाच हजार कोंबड्याचा आणि पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे पोल्ट्री मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले होते. यावेळी रात्रीच्या सुमारास वादळी वारा व वीजेच्या कडकडाटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास रेंगेपार दल्ली येथील ताराचंद यशवंत डोंगरवार यांच्या पोल्ट्री फार्मवर विज पडली. ज्यामध्ये पाच हजाराच्यावर कोंबड्या व त्यांचे पिल्लू मृत्यूमुखी पडले. याबाबतची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली असता स्थानिक तहसीलदारांच्या आदेशाने तलाठी काळे यांनी आज (दि. २३) पंचनामा करून वरिष्ठांना सादर केले. या घटनेत डोंगरवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.