सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापुरात विविध ठिकाणी कचर्याचे ढिग साठले आहेत. साठलेला कचरा पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरीही महापालिकाचा आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करत आहे. वास्तविक पाहता रस्त्यावर कचरा जाळणे गुन्हा आहे. महापालिकेच्या वतीने अद्याप एकही गुन्हा दाखल केला नाही.
सोलापुरात कचरा संकलनचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या प्रमाणात घंटागाड्या आहेत. कचरा संकलनाचे खासगीकरण केले आहे. कचरा संकलन करणार्यांवर महिन्याकाठी कोट्यवधी खर्च केले जातात. घंटागाड्या वेळेेत घरापर्यंत येत नाहीत. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यांवर टाकला जातो. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग साठले आहेत. महापालिकेच्या मोकळ्या जागेत, सार्वजनिका शौचालयांशेजारी कचरा टाकला जातो.
हा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे सोलापूर शहरात कचरा पेटवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. धुरामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. याकडे महापालिका प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. वास्तविक पाहता कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंडाची कारवाई सोलापूर महापालिका प्रशासनाकडून केली जाते. मात्र, शहरात कचरा जाळत असताना आतापर्यंत अशी कोणतीही कारवाई घनकचरा विभागाकडून केली नाही.
सकाळी झाडूवाल्या महिला रस्ते व परिसर स्वच्छ करतात. मात्र, झाडू मारल्यानंतर गोळा झालेला कचरा गोळा करून घंटागाडीमध्ये टाकणे बंधनकारक आहे. मात्र, या झाडूवाल्या महिलाही गोळा केलेला कचरा पेटवत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. यावर आरोग्य निरीक्षकांचे नियंत्रण असणे गरजेचे असताना आरोग्य निरीक्षकही दुर्लक्ष करतात.
कचरा जाळणे गुन्हा आहे. कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. असे प्रकार घडत असतील तर याप्रकरणाचा आढावा घेऊन चौकशी केली जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.- मच्छिंद्र घोलप, उपायुक्त, महापालिका