सोलापूर : यंदा सोलापूरसह राज्यात पावसास मे महिन्याच्या मध्यापासून सुरुवात झाली आहे. यंदा पाऊसमानही चांगला आहे. त्यामुळे पेरणीला लवकर सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून, आता खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचा सरासरी पेरणी क्षेत्र हे 3 लाख 37 हजार 96.13 हेक्टर असून त्यापैकी 3 लाख 15 हजार 32.68 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सुमारे 93.21 टक्के पूर्ण झाली आहे.
यंदा शेतकर्यांचा ओढा मका, सोयाबीन, उडीद या पिकांकडे असल्याचे दिसत आहे. या दोन्ही पिकांची पेरणीची सरासरी ही इतर पिकांपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 81270 इतकी असून 91448 हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरीच्या 112 टक्के पेरणी झाली आहे. उडिदाचे सरासरी क्षेत्र हे 58166.04 हेक्टर असून 80517.8 म्हणजे सरासरीच्या 138 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कमी कालावधीत आणि पावसावर येणारे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. यंदा शेतकर्यांनी मका पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी केली आहे. जिल्ह्यात मका पिकाची सरासरी क्षेत्र ही 47861.1 हेक्टर असून, 53764 हेक्टरवर म्हणजे 112.33 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मे महिन्यातील पावसामुळे जमिनीत पुरेसा ओल झाल्याने शेतकर्यांनी खरिपाची पेरणी उरकली. परंतु आषाढ महिन्यात सुटलेल्या वार्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे सोयाबीन, मका, उडीद पिकेही माना टाकत आहेत. पाऊस कधी पडेल याकडे शेतकर्यांच्या नजरा लागून आहेत.आषाढी एकादशीच्या दुसर्या दिवसांपासून पाऊस पडते, अशी वारकरी, भक्तांची आशा आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस पडला तरच पिकांवरील संकट टळणार आहे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढावण्याची दाट शक्यता आहे. हे शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे.
सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 81270 इतकी असून 91448 हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरीच्या 112 टक्के पेरणी झाली आहे. उडिदाचे सरासरी क्षेत्र हे 58166.04 हेक्टर असून 80517.8 म्हणजे सरासरीच्या 138 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन, मका, उडीद हे पीक लवकर येत असल्याने या पिकांची पेरणी हे शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.