पंढरपूर : कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. येणार्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने 1598 कर्मचारी सेवा बजावत आहेत. भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट, 65 एकर परिसर,पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास 1598 स्वच्छता कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे 350 कायम इतर 100 कर्मचारी तर जवळपास 1068 हंगामी कर्मचारी व 80 सुपरवायझर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून 50 स्वच्छता कर्मचार्यांचे पथक, जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत 30 पथके स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. प्रशासनामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तसेच वाळवंट परिसरात 15 ठिकाणी चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्र, वाळवंट परिसर, 65 एकर येथे हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले असून, कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशीन बसविण्यात आले आहेत. भक्तीसागर, पत्राशेड, वाळवंट या ठिकाणी मोफत 6 लाख पाणी बॉटल व 3 लाख ज्यूस बॉटल वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सुरक्षेसाठी 145 सीसीटीव्ही, शहरातील मुख्य रस्त्यावर विद्युत रोषणाई, शहरातील 17 ठिकाणी वाहनतळ व्यवस्थेचे स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौचविधी करू नये म्हणून 9 प्रतिबंधक पथकांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे.