सोलापूर : अतिवृष्टी, पुरामुळे जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. त्या 82 गावांमध्ये 120 तात्पुरते निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्व निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली पाच आरोग्य कर्मचार्यांचे पथक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यरत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या वतीने निवारा केंद्रांची पाहणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. उपकेंद्र हत्तुर येथील श्री सोमेश्वर मंदिरातील निवारा केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली.
तसेच विविध सूचना आरोग्य पथकाच्या टीमला दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी अंतर्गत मद्रे उपकेंद्रातील सिंदखेड गावस पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मद्रे आनंद नगर तांडा, आहेरवाडी कोणापुरे शाळा, बांकळगी जिल्हा परिषद शाळा येथे निवारा केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले. या ठिकाणी राहण्याची, भोजन, औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या विविध निवारा केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. नीलिम घोगरे (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी भेटी देऊन पथक आणि नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.
तालुका अधिकार्यांकडून पाहणी
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यात संगोगी ब, मैंदर्गी, शेगाव व करजगी प्रा.आ. केंद्रांतर्गत पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे यांनी शिबिरास भेट दिली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य टीम, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूरग्रस्त नागरिकांसाठी आवश्यक सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पूरग्रस्त बाधित गावामध्ये कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरणार नाहीत, या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग दक्षता घेत आहे.- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर