श्रीपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील 15 साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार आहे. त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (ता. माळशिरस) येथे सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कारखान्याच्या 10 हजार टन विस्तारीकरण गाळप, पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या साखर कारखान्याने 10 हजार मे.टन प्रति दिन गाळप क्षमता गाठली आहे आणि पोटॅश उत्पादन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना योग्य एफआरपी आणि इतर सुविधा देण्याचे काम कारखान्याने केले आहे. इथेनॉल करताना निर्माण होणाऱ्या उपउत्पादनातून सीबीजीसारखे अतिशय स्वच्छ इंधन तयार करता येते. साखर उत्पादनात आतापर्यंत टाकाऊ समजल्या जाणाऱ्या बाबी उत्पन्नाचे साधन ठरत आहेत. त्यामुळे कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासोबत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. समाजात अशाप्रकारचे निस्पृह नेते फार थोडे पहायला मिळतात. स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी मोठेपण मिळविले. त्यांना सर्व मोठे मालक म्हणत असले, तरी पंढरीच्या पांडुरंगाला मालक समजून सेवेकऱ्याच्या भावनेने त्यांनी आजन्म सामान्य माणसांची सेवा केली. दरम्यान, राज्यात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमास राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. उत्तम जानकर, आ. समाधान आवताडे, आ. अभिजीत पाटील, आ. नारायण पाटील, आ. दिलीप सोपल, आ. बाबासाहेब देशमुख, आ. राजू खरे, माजी खासदार रणजित नाईक- निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, शहाजी पाटील, दीपक साळुंखे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, उमेश परिचारक , व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कारखान्याचे सभासद, नागरिक उपस्थित होते.