सातारा : पुढारी वृत्तसेवा
हिंजवडी (पुणे) येथे लग्नात नवरदेवाला सोन्याचा कंडा घातला नाही. या कारणावरुन झालेल्या जाचहाटाला कंटाळून एका विवाहितनेने आत्महत्या केली. संबंधित विवाहिता ही मूळची शिरवळ, ता. खंडाळा येथील आहे. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय विवाहितेच्या आईने व्यक्त केला आहे.
याबाबत विवाहितेच्या आईने हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांच्या तपासाबाबत साशंकता आहे, असा आरोपही तिच्या आईने व्यक्त केला आहे. आसावरी अक्षय दळवी (वय २३, रा. लिओनारा सोसायटी, गोदरेज, म्हाळुंगे) या विवाहितेने हिंजवडीत आत्महत्या केली.
याप्रकरणी तिची आई जयश्री पवार (रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार आसवरीचा पती अक्षय अरविंद दळवी (वय २७, रा. भोसले मळा, अयोध्यानगरी सोसायटी, सातारा), सासू पुष्पा अरविंद दळवी (वय ४५) आणि नणंद प्रज्ञा राजेश शिर्के (वय ३४, रा. नेरुळ, नवी मुंबई) त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जयश्री पवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माझ्या मुलीचे गतवर्षी डिसेंबरमध्ये अक्षयशी लग्न झाले. यावेळी अक्षयच्या वडीलांनी मुलाच्या हातात सोन्याचा कंडा घालण्याची मागणी केली. तसेच मुलगी बँकेत कामाला असल्याने कुटुंबिय तिच्याकडून अर्धा पगार काढून घेत तिची आर्थिक कोंडी करत होते. तसेच विविध कारणांवरून तिचा मानसिक छळ करण्यास सुरूवात केली.
याबाबत आसावरीने आम्हाला सांगितले पण तिची आम्ही समजूत घातली. अखेर या छळाला कंटाळून आसावरीने हिंजवडीतील लिओनारा सोसायटीमधील घरात आत्महत्या केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी संशयितांना अटक केलेली नाही. तसेच पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तक्रार घेतलेली नाही. मुलीच्या मृतदेहाचे निरीक्षण केल्यानंतर ही आत्महत्या नव्हे तर पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येत आहे. माझ्या मुलीचा तिच्या सासरच्या लोकांनी खून केला आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी पवार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.