सातारा : कथित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे. दिव्यांगांसाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळवलेल्या 359 उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकार्यांना दिला आहे. अहिल्यानगर व बुलढाणा या जिल्ह्यात बोगस अपंग प्रमाणपत्राचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचार्यांची यादी त्यांनी शासनाला दिली असून त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील काही कर्मचार्यांचाही समावेश आहे. बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगांवर अन्याय होत असून ते नोकरीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी आ. कडू यांनी केली आहे. आ. बच्चू कडू यांनी 19 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवले होते. त्यातून शासकीय व निमशासकीय विभागांत 359 बोगस उमेदवार आढळले आहेत. याबाबतची यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली. त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला आहे. बोगस प्रमाणपत्रामुळे आ. बच्चू कडू हे आक्रमक झाले असून या सर्वांना घरी घालवण्याची त्यांनी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामध्ये अगदी 2007 पासून आता 2024 पर्यंत नोकरीत लागलेल्यांचा समावेश आहे.
बोगस प्रमाणपत्र आढळलेल्या कर्मचारी व अधिकार्यांनी विविध विभागांत ठाण मांडले आहे. त्यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, लेखापाल, सहायक नगर रचनाकार, अभियंता, उपजिल्हाधिकारी, तलाठी, वित्त व लेखाचे संचालक, डाक सहायक, विक्रीकर निरीक्षक, तहसीलदार, पुणे महापालिका, ग्रामविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.