शाळांमधील तक्रारपेट्या बनल्यात शोपीस Pudhari Photo
सातारा

शाळांमधील तक्रारपेट्या बनल्यात शोपीस

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांतर्गत शाळांमध्ये बसवण्यात आलेल्या तक्रार पेट्या शोपीस बनल्या आहेत. यामध्ये आलेल्या तक्रारींची शाळा व्यवस्थापनांनी दखलच न घेतल्याचे वास्तव क्षेत्रीय अधिकारी भेटीमध्ये समोर आले आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांनी याची दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेणार्‍या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

  • तक्रारपेटी दर्शनीभागात, प्रवेशव्दारानजीक आवश्यक.

  • तक्रारींची त्वरित नोंद घेवून कार्यवाही व उपाययोजनांची गरज.

  • गंभीर तक्रारींच्या निपटार्‍यात पोलिस पाटील व पोलिसांची मदत घेणे आवश्यक.

  • लैंगिक छळाच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीच्या कक्षेत

राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने विद्यार्थी सुरक्षिततेबाबत ठोस उपाय योजनांतर्गत सर्व शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्याच्या सूचना परिपत्रक काढून दिल्या होत्या. या उपक्रमाच्या अंमलबजावणीाबाबत मार्गदर्शनही केले होते. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने या तक्रारींचा निपटारा करणे गरजेचे आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षणाधिकार्‍यांच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालकांकडून राज्यभर झाल्याने जिल्ह्यातील शाळांमध्येदेखील अशा तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थी आपल्या तक्रारीदेखील टाकत आहेत. मात्र या तक्रार पेट्यांमध्ये आलेल्या तक्रारींवर शाळा प्रशासन व व्यवस्थापनाने कोणतीच कार्यवाही न केल्याचे दाहक वास्तव शिक्षण विभागाकडून होणार्‍या क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या शालेय भेटीत समोर आले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक सहविचार सभेत शिक्षणाधिकार्‍यांनी संबंधित शाळांना सूचना केल्या आहेत. मात्र बदलापूर, मुंबई येथील शालेय मुलींवरील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांनी परिपत्रक काढूनच तक्रारपेटीतील तक्रारींची दखल घेवून योग्य त्या उपाययोजना न केल्यास शाळांना कारवाईचा इशारा दिला आहे.

पालक वर्गात धास्ती...

मुलांच्या जडणघडणीमध्ये पालकांइतकाच वाटा शाळा व शाळेतील शिक्षकांचा असतो. दिवसभरातील आठ तास मुले शाळेत व शिक्षकांच्या निगराणीत असतात. त्यामुळे पालक निर्धास्त असतात. मात्र गेल्या काही दिवसांमधील तसेच बदलापूर विद्यार्थिनी अत्याचार घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्कूल बसमध्ये विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याने बहुतांश शाळांकडून विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसेसमध्ये काळजीवाहक नियुक्त करण्यात आला आहे. मात्र शाळांमधून अशी निंदनीय कृत्ये वारंवार होत असल्याने पालकांमध्ये धास्ती वाढली आहे.

तक्रार पेटीबाबत काटेकोर अंमलबजावणीवर भर देणार असून शाळांना पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत. हलगर्जीपणा झाल्याचे शाळाभेटीदरम्यान समोर आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT