सातारा : बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ना. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, शिल्पकला, दुर्मीळ ग्रंथ आणि पुरातन वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे. संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.