कर्जत शहरानजिकच्या सावली गावात पाणीटंचाई pudhari photo
रायगड

Karjat water crisis : कर्जत शहरानजिकच्या सावली गावात पाणीटंचाई

छोटेसे गाव पिढ्यान्‌‍पिढ्या सहन करीत आहे पाणीटंचाईच्या वेदना; नेते, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

कर्जत तालुक्यातील किरवली हे गाव... लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण पाणी थांबत नाही... कारण बंधारा फक्त मातीचा, तर योजना मात्र कागदावर तर प्रशासन झोपलेले.

गावाचे पोलिस पाटील विवेक बडेकर आणि ग्रामस्थ गेली अनेक वर्षे स्वखर्चाने मातीचा बंधारा बांधत आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की आशा जागते, यावेळी तरी पाणी साठेल... पण काही दिवसांनी माती वाहून जाते, आणि आशा पुन्हा कोरडी पडते. फेब्रुवारी महिना आला की नाल्यात पाणी नसतं, बोरवेल कोरडी पडते, बोअरींगचा आवाजही बंद होतो. गावातील माणसांना, त्यांच्या जनावरांनाही तहान भागवता येत नाही!

कर्जत तालुका तसेच शहर हे रायगड जिल्ह्याचे राजकीय आणि प्रशासकीय केंद्र असल्याने व आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पक्षनिष्ठ नेते असे सगळेच असताना व त्यांच्या विकासाच्या कामांच्या घोषणां पाहाता मात्र कर्जत शहरा लगत व शहराच्या सावलीत असलेल्या किरवली गाव हे ताहानलेल्या अवस्थेत आहे. पाली-भुतिवली धरण फक्त 6 ते 7 किमी, उल्हास नदी 2 ते 3 किमी, पेज नदी 10 ते 15 किमीवर असताना, मात्र किरवली गाव हे पाण्याविना असल्याने, विकासाचा मोठा डंका पिटणाऱ्यांना हे भयान वास्तव दिसत नाही का ? व किरवली गाव हे शासनाच्या नकाशात नाही का ? असा प्रश्न मात्र येथील ताहनलेल्या ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

मागील चार दशकांत सत्तेचा स्वाद सर्व पक्षांनी घेतला. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना, तर कधी भाजप सर्वांना संधी मिळाली, सर्वांनी आश्वासन दिले. पण पाणी काही आले नाही. मात्र गावाची अवस्था ही ताहनलेली ! निवडणूक आली की घोषणा येतात आम्ही पाईपलाईन टाकू, पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करू, पण निवडणूका संपल्या की आश्वासन ही पाणी आटल्याप्रमाणे आटत जात असल्याने, मात्र आज 2025 मध्येही किरवली ही तहानलेले आहे.

या सर्व परस्थितीला फक्त लोकप्रतिनिधीच नाहीत तर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, जलजीवन मिशनचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ या सर्वांचाच निष्क्रियपणा असलाचे, तर जलजीवन मिशनसारख्या योजनांत कोट्यवधींचा निधी खर्च दाखविला जातो, अशी परखड व्यथा ही किरवली ग्रामस्थांकडून मांडल्या जात आहे.

तर कर्जत तालुका हा निर्सगरम्य अशा हिरवळीसाठी आणि फार्महाऊससाठी ओळखला जातो. येथे पावसाचे प्रमाणही भरपूर आहे. तरी ही किरवलीच्या वाट्याला कोरडे पणा व त्यामध्येच लोकप्रतिनिधी यांच्या सह शासन प्रशासनाची कोरडी वचने आणि कोरडे प्रशासन अशी परस्थिती !

पाण्याच्या नजरेतून पाहिलं, तर किरवली म्हणजे दुष्काळाचं जिवंत एक रूप असल्याचे समोर येत आहे. धरण भरलेली, नदी दुथडी भरून वाहात असताना मात्र किरवली गावात पाण्याचा थेंबही पोहचत नाही. ही शासनाच्या अपयशाची लाजीरवाणी कहाणी असल्याचे बोलणे देखील वावगे ठरणार नाही.

गाव सोडण्याची वेळ

फेब्रुवारीनंतर किरवली गावातील अनेक कुटुंबं आपल्या मुलाबाळांसह गाव सोडतात. पाणी नाही. जगायचं कसं ? हा त्यांचा प्रश्न. पण हा प्रश्न राजकारण्यांच्या भाषणात नाही, अधिकाऱ्यांच्या अहवालात नाही, आणि शासनाच्या प्राधान्यक्रमात नाही. शासनाने नेहमीच टँकर पाठवला, मात्र कायमस्वरूपी उपाययोजने पासून मात्र दूरच राहीला आहे. किरवलीसारखी गावे ही प्रशासनाच्या उदासीनतेची एक जिवंत साक्ष असुन, नेते झोपले, अधिकारी झोपले मात्र किरवलीची जनता ही तहानलेली. यामुळे आता विकासाच्या गप्पा लोकांना चालत नाहीत. लोक पाण्याविना जगू शकतात, पण खोट्या घोषणांवर नाही. किरवलीसाठी फक्त पाणी नाही, तर न्यायाची तहान भागवण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT