खालापूर : गरीब व कष्टकर्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने राज्य सरकाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली खरी मात्र काही केंद्राचा अपवाद वगळता अनेक केंद्रात थाळी रिकामी असून शिवभोजन केंद्र चालकांचे मात्र पोट भरत आहे.
राज्य सरकाने 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. गरीब व गरजूना शिवभोजन थाळी योजनेमुळे एक वेळच्या
जेवणाची भ्रांत दूर व्हावी हा हेतू आहे. अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण यामुळे शिवभोजन थाळी केंद्राबाहेर रांगा लागतात. डाळ, भात, दोन चपाती आणि भाजी यामुळे भरपेट जेवण मिळते.
शहरात जिल्ह्यात किंवा तालुक्याच्या ठिकाणी शहरातील रुग्णालये नजीक, बसस्थानके, शासकीय कार्यालये, बाजारपेठेची ठिकाणे या ठिकाणी ही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली. शिवभोजन थाळी घेताना आधारकार्ड क्रमांक नमुद करून त्याचा फोटो घेतला जातो.परंतु काही ठिकाणी भोजन थाळी ऐवजी थंडगार पाण्याची बाटली तर काही ठिकाणी वडापाव देवून फोटो घेतले जातात. भोजन थाळीचे लाभार्थी ठरलेले असून केवळ फोटो साठी काही केंद्र चालकानी लाभार्थी तयार केले आहेत. त्यामुळे शासनाची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असून शिवभोजन केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून सत्य परिस्थिती पुरवठा विभागाने तपासणे गरजेचे आहे.
शिवभोजन केंद्र ठिकाणी सीसी टिव्ही आवश्यक असताना अनेकांनी सीसी टिव्ही बसवले नाहीत. ग्रामीण भागात अनेक तक्रारी असून पुरवठा विभागाचे लागेबांधे असल्याचे अनेक जण सांगतात. एका कुटुंबात एकच शिवभोजन केंद्र असा नियम असताना खालापूर तालुक्यात एकच कुटुंब वेगवेगळ्या नावांनी केंद्र पदरात पाडून शासनाची फसवणूक करत आहे.