बारामती: जनाई उपसा सिंचन योजनेच्या तिसर्या टप्प्यातील रायझिंग मुख्य वाहिनी ते बोरकरवाडी तलावापर्यंत करण्यात आलेल्या वाहिनीद्वारे पाण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भूजलपातळीचा विचार करता नागरिकांनी पाणीवापराबाबत काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या वाहिनीचे काम करण्यात आले आहे. कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, जनाई शिरसाई योजनेचे कार्यकारी अभियंता अशोक शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, कुतवळवाडी-बोरकरवाडीच्या सरपंच रूपाली भोसले, उपसरपंच राणी बोरकर, टीसीएस फाउंडेशनचे सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या 460 कोटी रुपयाच्या बंद जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. शासनाच्या वतीने करण्यात येणार्या पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधीची गरज असते, त्यामुळे नियमितपणे पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
उपसा सिंचन योजनेसाठी सौर पॅनल
आगामी काळात जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी सौर पॅनल बसविण्यात येणार आहे. सौरऊर्जेद्वारे निर्मिती होणारी वीज महावितरण कंपनीला दिली जाणार असून, यामुळे योजनेच्या वीजदेयकात कपात होईल, त्यामुळे शेतकर्यांना पाणीपट्टीतही लाभ होईल, अशी माहिती पवार यांनी दिली.