पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे स्थानक परिसरात विक्रेत्यांनी अवैधरित्या आपली दुकाने, टपर्या, हातगाडी लावून बस्तान मांडले आहे. रेल्वे स्थानकातील पाण्यावरच विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत. रेल्वे विभागाने स्मार्ट केलेल्या स्थानकांचे मुख्यद्वार मात्र अशा अवैध टपर्यांमुळे बकाल झाले आहेत. परंतु अवैध टपर्यांवर कारवाईबाबत महापालिका उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातील केंद्रीय सदनमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये आहेत. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालये व अनेक शैक्षणिक संस्था असल्याने या स्थानकामधून प्रवास करणार्यांची संख्या इतर स्थानकांच्या प्रमाणात अधिक असल्याने स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
मात्र रेल्वेच्या परिसरात अनेक अवैध हातगाड्या टपर्या थाटल्याने प्रवाशांना ये-जा करताना व वाहने पार्क करताना अडचणी येत असल्याने वादाच्या घटना घडत आहेत. महापालिका कर्मचारी या दुकानांवर कारवाई करण्याबाबत उदासीन असून, रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करत असल्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा विक्रेत्यांना धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विक्रेते सर्रासपणे थाटामाटात आपली दुकाने मांडून बसले आहेत.
शहरातील एकूण दहा स्थानकांपैकी सर्वात स्वच्छ स्थानक म्हणून आकुर्डी रेल्वे स्थानकाचा गौरव करण्यात आला आहे. स्थानकात अनेक झाडे लावण्यात आली असून, लोखंडी जाळ्या लावून संरक्षित केले. तसेच हिरकणी कक्षाची उभारणीही करण्यात आली होती. त्यामुळे स्थानकाच्या सुंदरतेमध्ये भर पडली होती. मात्र स्थानकाबाहेरील अतिक्रमण सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे.
रेल्वेच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणांवर महापालिका कारवाई करीत नाही. असा समज विक्रेत्यांमध्ये आहे. त्यामुळे या जागेत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, विक्रेत्यांना कारवाईची चिंताच उरली नाही.
रेल्वेच्या पाण्याचा वापर
परिसरातील खाद्य पदार्थ बनविणारे हे विक्रेते स्टेशनमधील पाणी वापरतात. भांडी धुणे आणि पिण्याच्या पाण्यासाठीदेखील स्थानकातील पाण्याचा वापर करत आहेत. मात्र रेल्वेला पाणीपट्टी कर भरावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे.
शोभेपुरती कारवाई
काही दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई केली. मात्र पुन्हा दुसर्या दिवशी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे पालिका केवळ शोभेपुरती कारवाई करीत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.
स्थानक परिसरात झालेल्या अतिक्रमणावर कारवाईसाठी रेल्वेच्या वतीने महापालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, कारवाईदेखील झाली; मात्र दुसर्या दिवशी पुन्हा दुकाने थाटली जातात. रेल्वे कर्मचारी सदैव महापालिकेला कारवाईदरम्यान उपस्थित राहून सहकार्य करीत आहेत.
– मुकेश कुमार, एसएसई, रेल्वे विभाग.
हेही वाचा: