बारामती : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) असे तीन पक्ष एकत्रित निवडणूकांना सामोरे जात आहोत. कोणती जागा कोणता पक्ष लढवणार हे निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. येत्या आठ-दहा दिवसात ती संपेल, अशी माहिती ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्हा तीन घटक पक्षांना जागेबाबत एकवाक्यता करावी लागेल. ही प्रक्रिया झाली की तो-तो पक्ष तेथे कोणाला उमेदवारी द्यायची याचा विचार करेल.
राष्ट्रवादीच्या वाट्याला ज्या जागा येतील तेथे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील व इतर वरिष्ठ नेत्यांची समिती मुलाखती घेतील व उमेदवार निश्चित करतील. पण सध्या आम्ही कुठेही गेलो तरी इच्छुक शिष्टमंडळ घेवून भेटत आहेत. लोकशाहीत ही चांगली प्रक्रिया आहे. एकाने निर्णय घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही जिल्ह्याजिल्ह्यात जावून इच्छुकांचा अभ्यास चालू केला आहे. त्या आधारे उमेदवार निश्चिती होईल.
पाच वर्षापूर्वी काँग्रेसचा एक तर राष्ट्रवादीचे चार खासदार होते. आता मविआचे ३० लोक निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण चांगले आहे. आशादायी चित्र आहे असे पवार म्हणाले.