नाशिक : बदलापूर येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. राज्य शासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या पद्धतीने आंदोलन झाले, गाड्या भरून आल्या, दगडफेक झाली, हे सर्व बघता आपण शोक व्यक्त करत होतो की राजकारण, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (दि. २१) व्यथा मांडली. आंदोलनामागे कोण होते हे चौकशीतून समोर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री भुसे हे बुधवारी (दि. २१) नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी बदलापूर घटनेबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावर घडलेला प्रकार दुर्दैवी असून, शिक्षणमंत्र्यांनी पण दखल घेतली आहे. कामात कुचराई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. पण ज्या पद्धतीने आंदोलन झाले ते बघता आपण शोक व्यक्त करत होतो की राजकारण हे कळत नव्हते. काही काळ आंदोलन होणे ठीक आहे. पण नऊ ते दहा तास आंदोलन चालले. गाड्या भरून लोक आले. पाण्याच्या बाटल्या व दगडफेक करण्यात आली. त्यामुळे मूळ घटनेचे गांभीर्यच कमी झाले, असे मत भुसे यांनी व्यक्त केले.
आदिवासी पेसा भरतीसंदर्भातील आंदोलनावर बोलताना सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा विषय बाकी होता. माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्राच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. सरकारकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवे अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी व्यक्त केली.