नगर : गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुलनेत यंदा उन्हाळ्याची दाहकता कमीच आहे. मात्र तरीही जिल्ह्यात एप्रिलमध्येच 54 टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला आहे. यात सर्वाधिक 19 टँकर पारनेर, संगमनेरात 16, पाथर्डी 11 आणि नगर तालुक्यात 8 टँकर सुरू आहेत. मे महिन्यात टँकरचा हा आकडा आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत.
सन 2023 मध्ये पाऊस कमी पडल्याने त्याचा परिणाम 2024 मध्ये पाहायला मिळाला. गेल्या वर्षी 2024 मध्ये भीषण टंचाई पाहायला मिळाली. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 24 टँकर सुरू करावे लागले होते. एप्रिलमध्ये हाच आकडा 106 पर्यंत पोहचला होता. तर मे महिन्यात जिल्ह्यातील 293 गावे, 1 हजार 578 वाड्यांना 316 पाण्याचे टँकर सुरू करावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर जुनपासून पावसाळा सुरू झाला. जुुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही सरासरी पाऊस झाला.
धरणे चांगली भरली, छोटी मोठी तलावेही ओसंडून वाहताना दिसली. ओढे नालेही भरून वाहिली, यातून भूजल पातळीही चांगली वाढलेली दिसली. त्याचा चांगला परिणाम 2025 च्या उन्हाळ्यात पहायला मिळाला आहे. सध्या शेती व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तने सुरू आहेत. अनेक भागात भूजल पातळी अजुनही बरी आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता तशी कमीच जाणवत आहे. असे असतानाही काही गावांच्या नशीबी टँकर पाचवीलाच पुजलेले आहे. जलजीवन योजनांमुळे तरी ‘त्या’ गावांचा टँकरचा वनवास थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र काही गावांना अजुनही टँकरवरच तहान भागवावी लागत आहे.
जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने विहिरी तसेच बोअरवेल्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संगमनेर तालुक्यातील एक गावासाठी आणि दोन टँकर भरण्यासाठी अशा तीन विहिरी, बोअरवेल्स अधिग्रहित केल्याचे प्रशासनाकडून समजले.
‘जलजीवन’मुळे किती टँकर कमी झाले?
जलजीवन योजनेतून उन्हाळ्यात ज्या गावांना टँकर लागतात, त्या ठिकाणी प्राधान्याने योजना पूर्ण करण्याच्या शासनाकडून सूचना होत्या, असे समजते. त्यामुळे दरवर्षी टँकर लागणार्या किती गावांत योजना पूर्ण झाल्या आणि योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने टँकर यंदा बंद आहेत, याची आकडेवारी समोर आल्यानंतर योजनेचे यश आणि अपयश दिसून येणार आहे. अर्थात त्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे.