मुंबईः पुढारी वृत्तसेवा
हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सत्तांतर झाल्यास महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोसळेल, असे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त गोंदिया येथे दौऱ्यावर असलेल्या चव्हाण यांच्या या वक्तव्याने खळबळ माजवली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकारही तेरा महिन्यांत कोसळले होते, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. महाराष्ट्रातील जनतेने जर राज्यात सत्तांतर घडवून आणले तर हे शक्य आहे, असेही ते म्हणाले. सध्याच्या स्थितीत मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातली सध्याची स्थिती वाईट आणि निराशा निर्माण करणारी आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत. बदलापूरची झालेली दुर्घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा, यामुळे सरकारविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेत त्यांच्याविषयी चिड आहे. त्यामुळे या वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सद्यस्थितीत केंद्र सरकारला बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी कोणताही प्रश्न सोडवता आला नाही. राज्यातील तिघाडी सरकारही या प्रकरणी अपयशी ठरले आहे. सध्या तर त्यांच्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे, असे ते म्हणाले.