मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी निवडणूक आयोगाने मुंबई भेटीत फेटाळून लावली. येत्या दोन दिवसांत तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेशही आयोगाने दिले.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राजकीय पक्षांकडून खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तसेच काही वस्तूंचे दर कमी करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. मात्र निवडणूक खर्चाची मर्यादा देशपातळीवर एकच असून महागाई निर्देशांक लक्षात घेऊन ही मर्यादा ठरली असल्याने ही मर्यादा वाढणार नाही, असे राजीव कुमार म्हणाले.
तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांच्या गृह जिल्ह्यातून बदली करण्यात यावी. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणावी, कोणालाही त्यांच्या मर्जीप्रमाणे बदली देण्यात येऊ नये, याकडे आमचे विशेष लक्ष आहे. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी एकाच ठिकाणी तीन वर्षे काम करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या येत्या दोन दिवसांत बदल्या करण्याचे आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी अधिक असताना राज्यातील कुलाबा, पुणे, मुंबादेवी, अशा शहरी भागातील मतदानाचा टक्का नेहमीच कमी दिसतो आहे. केवळ ४० टक्क्यांच्या आसपास येथे मतदान होते. त्यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे. ज्यांची नावे अद्याप मतदान यादीत नाहीत त्यांनी ती अद्ययावत करावीत, असे आवाहनही निवडणूक आयुक्तांनी केले.