Child Death Road Accident | कल्याण-शीळ महामार्गावर टेम्पोखाली चिरडून अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू  
मुंबई

Child Death Road Accident | कल्याण-शीळ महामार्गावर टेम्पोखाली चिरडून अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावर भरधाव टेम्पोखाली चिरडून अडीच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कविश जयंत झांबरे (वय 2 वर्षे 5 महिने) असे निरागस बालकाचे नाव आहे.

सद्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून परिणामी हा महामार्ग आक्रसल्यामुळे वारंवार लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास या महामार्गावरील सोनारपाडा गावाच्या समोर ही काळजाचा ठोका चुकविणारी हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगात चाललेल्या टेम्पोखाली चिरडून अडीच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हायवा ताब्यात घेऊन फरार ड्रायव्हरचा शोध सुरू केला आहे. कविश हा माता-पित्यासह डोंबिवली नजीक नांदिवली येथील सोसायटीत राहत होता. या प्रकरणी दुर्दैवी कविशचे वडील जयंत झांबरे (36) यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या गोळवली येथील पंपावर पेट्रोल भरून जयंत झांबरे हे बुलेटवरून घराकडे चालले होते. यावेळी त्यांचा मुलगा कविश हा पाठीमागे बसला होता. 8.30 वाजण्याच्या सुमारास सोनारपाड्या समोरील डीएनएस बँक चौकात येताच भरधाव वेगात चाललेल्या ट्रकने पाठीमागून बुलेटला जोरात ठोकर दिली. त्यामुळे जयंत यांच्या मागे बुलेटवर बसलेला कविश रस्त्यावर पडला व ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाला. निरागस बालकाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातील वातावरण क्षणार्धात तापले. त्यामुळे भीतीमुळे ड्रायव्हरने ट्रक तेथेच सोडून पळ काढला. फरार ड्रायव्हरचा पोलीस शोध घेत आहेत.

मृत्यूचे तांडव थांबणार कधी?

कल्याण-शीळ महामार्गावर यापूर्वी अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये रहदारीचा अडथळा, वाहतूक कोंडी, भरधाव वेगात वाहने चालवणे आणि रस्त्यांची अपुरी अवस्था यांसारख्या कारणांमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. सप्टेंबर महिन्यात कंटेनरखाली चिरडून दोघा स्कूटरस्वारांना जीव गमवावा लागला. एमएसआरडीसीने रस्त्यावर नवीन दुभाजक बसवल्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे प्रवासी 4 ते 5 तास अडकून पडले होते. हे वारंवार घडते. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने हा महामार्ग जागोजागी आक्रसला आहे. परिणामी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT