नायगाव, पुढारी वृत्तसेवा : पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांच्या फरकाने पत्नीने देखील आपला जीव सोडल्याची ही घटना बरबडा येथे घडली. आयुष्याची ६५ वर्षे सुखाने संसार केल्यावर एका वृद्ध दांपत्याने शेवटी देखील 'सात जियेंगे साथ मरेंगे'ची शपथ निभावत आपली साथ सोडली नाही.
नागधरे (वय ८५) यांचे सोमवारी (दि.२३) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गंगाराम नागधरे यांचे निधन होताच त्यांची पत्नी महादाबाई यांनी देखील मंगळवारी (दि.२४) पहाटे ५ वाजता म्हणजे अवघ्या सात तासांत या जगाचा निरोप घेतला.
आयुष्याची ६५ वर्षे प्रपंचात त्यांनी ऊन पावसाला तोंड देत आपला संसार फुलविला होता. उभी हयात एकमेकाच्या सहवासात घालवल्यानंतर पती गंगाराम यांच्या पश्चात केवळ सात तासांमध्ये महादाबाई यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आयुष्यभर एकेमकांची साथ सोडली नाही. गंगाराम नागधरे आणि महादाबाई नागधरे यांनी ६५ वर्षांपूर्वी लग्नाच्या वेळी एकेमकांना साथ देण्याचे दिलेले वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळले. या ६५ वर्षांच्या काळात त्यांच्यावर अनेक संकटे आली. पण त्यांच्या संसाराची गाठ शेवटच्या श्वासापर्यंत नियतीही तोडू शकली नाही.
प्रत्येक सुख-दुःखात दोघांनी एकमेकांना साथ दिली. प्रत्येक अडचणीचा मिळून सामना केला. मोठ्या कष्टाने लेकरांना मोठे करत त्यांच्या पायावर उभे केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातू, पणतू असा परिवार असून, थोरला मुलगा केंद्रीय पोलिस दलातून सेवानिवृत्त आहे. दोन्ही मुले आता शेती सांभाळत आहेत.