वैजापूर : सत्तेसाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या ४० आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कलंक लावला आहे. वैजापुरलाही याच गद्दारीचा कलंक लागला आहे. येणाऱ्या निवडणुकीत हिम्मत असेल तर गद्दारांनी शिवसेनेच्या मशालीला सामोरे जावे जावे व वैजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैजापुरच्या जाहीर सभेत दिले. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वैजापूरमध्ये शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. यानिमित्त ते बोलत होते.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, निवडणूक जवळ आल्यामुळे या सरकारने विविध योजनांची खैरात सुरु केली आहे. पण आम्हाला भीक नको, आमच्या हक्काचे हवे आहे. जनतेचाच पैसा जनतेमध्ये देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा करतानाही भ्रष्टाचार केला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा नागपुरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती केली. मात्र या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, अशी टिका त्यांनी यावेळी केली.