गेवराई : वन्य प्राण्याकडून पिकांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी शेतातील पिकाच्या संरक्षणासाठी एका शेतकऱ्याने तारेचे कुंपण घालून त्यात वीजपुरवठा सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. शालिनी बड्या भोसले (वय.४० रा. औरंगपूर ता. गेवराई) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बऱ्हाणपूर शिवारात सोमवारी (दि.24) दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून शेतकऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
करंट सोडल्यास मनुष्याच्या जीवीतास धोका होऊ शकतो, याची जाणीव असतानाही नारायण रामा राऊत रा. बऱ्हाणपूर (ता. गेवराई) या शेतकऱ्याने भुईमुगाच्या पिकाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण करुन त्यात वीजप्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श होऊन करंट लागून शालिनी बड्या भोसले गायरान जमीन आहेर वाहेरवाहेगाव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे पती बड्या चिंग्या भोसले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात शेतकरी नारायण रामा राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.