Struggle to start a factory for farmers' rights Former MLA Bhimrao Dhonde
राजु म्हस्के
बीड, पुढारी वृत्तसेवा: कडा, आष्टी परिसरातील ऊस उत्पादकांसाठी हक्काचा असलेला महेश सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी आमचा संघर्ष आहे. विद्यमान आमदारांनी त्यांच्या खासगी कारखान्याचा परवाना मिळावा याकरिता या कारखान्याचा गाळप परवाना रद्द केल्याने ९ लाख टन ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण झाला असून या शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केले.
महेश सहकारी साखर कारखान्याला गाळप परवाना मिळावा याकरिता माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी शुक्रवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात आष्टीसह शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी आमदार भिमराव धोंडे म्हणाले की, महेश सहकारी साखर कारखाना उभा करण्यात अनेकांचे योगदान आहे. मी हा कारखाना उभा करतांना यात सहभागी नव्हतो परंतु तत्कालीन आमदार व इतर राजकीय नेत्यांनी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टीने हा कारखाना उभा केला. हा कारखाना पुढे माझ्या ताब्यात आला, त्यावेळीही मी अतिशय सक्षमतेने तो चालवला. परंतु पुढे आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना काही वर्ष बंद राहिला. परंतु या दरम्यानच्या काळात कारखाना गाळप परवानाच रद्द करण्यात आला.
तो रद्द होऊ नये याकरिता आम्ही प्रशासकीय दरबारी पाठपुरावा केला, परंतु विद्यमान आमदारांनी त्यांच्या खासगी साखर कारखान्याला परवाना मिळावा याकरिता या कारखान्याचा परवाना रद्द केल्याचा आरोप करत आ. सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. विद्यमान आमदारांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी आणखी दोन साखर कारखाने सुरु केले तरी मला अडचण नाही, परंतु या सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरु होणे गरजेचे आहे.
आपण अनेकदा पाहतो की, खासगी साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांची लूट केली जाते, त्या ठिकाणी काटा मारला जातो, इतरही अनेक गैरप्रकार होतात. सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनीच उभा केलेला असल्याने त्या ठिकाणी असे गैडाकार होत नाहीत. त्यामुळे महेश सहकारी साखर कारखाना सुरु झाला तर या भागातील शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी हक्काचा कारखाना मिळेल असे माजी आ. धोंडे यावेळी म्हणाले.
... तर साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
आंदोलकांना मार्गदर्शन करतांना माजी आ. भिमराव धोंडे म्हणाले की, मी आजवर अनेक आंदोलने करत जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत. यापुढे देखील आम्ही कायम शेतकऱ्यांसोक्त आहोत, महेश साखर कारखान्याला परवाना न मिळाल्यास साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील भिमराव धोंडे यांनी यावेळी दिला.