आंबा चोंडी : वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे वसमत आगाराची बस अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बसचे ९० टक्के नुकसान झाले आहे. मागील ३२ वर्षापासून हि बस पिंपराळा येथे मुक्कामी येते.
वसमत आगाराची वस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी पिंपराळा येथे मागील ३२ वर्षापासून मुक्कामी थांबते, पिंपराळा, कुरुंदा येथील विद्यार्थी घेऊन बस सकाळी वसमत येथे पोहोचते. याबसमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होते. दरम्यान, नेहमी प्रमाणे रविवारी रात्री बस (एमएच-२०- ०८६३) पिंपराळा येथे मुक्कामी आली होती. बस तेथे असलेल्या मंदिरा समोर उभी करून चालक व वाहक मंदिराच्या परिसरात झोपले होते.
मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बस पेटवून दिली. रात्रीच्या वेळी एक व्यक्ती लघुशंकेसाठी उठला असतांना त्याला बस जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडा ओरडा करून गावकऱ्यांना जागे केले. गावकऱ्यांनी बाजूलाच असलेल्या विहीरीवरून पाणी आणून आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. त्यानंतर विद्युतपंप सुरु करून पाणी टाकल्यानंतर आग नियंत्रणात आली.
याआगीमध्ये बस ९० टक्के जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. बसच्या संपूर्ण सीट जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार भगीरथ सवंडकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घेतलेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी बस पेटवून दिल्याची शक्यता असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.
मागील ३२ वर्षापासून वसमत आगाराची बस मुक्कामी येते. आता पर्यंत मुक्कामी थांबलेल्या बसचे कधीही थोडेफार देखील नुकसान झाले नाही. मात्र रविवारी या घटनेमुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांच्या पाहणीनंतरच नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे.