इचलकरंजी : इचलकरंजी शहरासह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर गत पाच वर्षे भाजपसोबत राहिलो. प्रवेशाच्या अनेकवेळा चर्चा झाल्या; मात्र काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता भाजपच्या ज्येष्ठ नेतेमंडळींनी पक्षप्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे इचलकरंजीतील भाजप सोबत सुरू असलेला संघर्ष आता संपला आहे. आता एकजुटीने भाजपचे काम करणार आहे, असे प्रतिपादन आ.प्रकाश आवाडे यांनी केले. विधानसभेसाठी डॉ. राहुल आवाडे हेच महायुतीमधील भाजपचे उमेदवार असतील, असा निर्वाळाही त्यांनी दिला. ताराराणी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक झाली. प्रारंभी प्रकाश दत्तवाडे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर आ. आवाडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
1985 पासून राजकारणात सक्रिय आहे. सर्वांच्या पाठबळामुळे 2019 मध्ये विजयी झाल्यानंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. भाजप प्रवेशाची चर्चा झाली. मात्र, अडचणीमुळे ते झाले नाही. मी कोणाच्याही दारात जाणार नाही सन्मानाने बोलवले तर अवमान करणार नाही, असेही जाहीर केले होते. मात्र, आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजप प्रवेशाचा निरोप आला आहे. त्यामुळे भाजप सोबतच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. माजी आ. सुरेश हाळवणकर यांनीही एकमेकांना सहकार्य करू, असे सांगितल्याने आता वाद होऊ नये याची दोघांनीही काळजी घेऊन पक्ष संघटना बळकट करू. इतर ठिकाणच्या मतदारसंघाविषयीची भूमिका परिस्थितीनुरूप व चर्चेतून ठरवूया. येथेही महायुतीला अधिक यश मिळावे, यासाठी सर्वांनी ताकद लावू.
जि. प. माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी गेल्या पाच वर्षांत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतला. प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, उर्मिला गायकवाड, नजमा शेख, बंडा पाटील, नीलेश पाटील, संजय केंगार, महेश पाटील, सतीश मुळीक, सुहास कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सुनील पाटील यांनी आभार मानले.