जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा
पावसाचे पाणी आल्याने रविवारी (दि.22) मध्यरात्री सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग बंद झाला आहे. अशातच आता सांगली कोल्हापूर मुख्य असलेल्या महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथे कल्पवृक्ष गार्डनजवळ भले मोठे झाड महामार्गावर पडल्याने सांगली कोल्हापूर महामार्ग पूर्णतः ठप्प झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.23) रात्री अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमुळे कोल्हापूर बाजूला सुमारे आठ ते दहा किलोमीटर व सांगली मिरज बाजूला सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागण्याने हजारो वाहने अडकून पडले होती.
याबाबत अधिक माहिती अशी शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मध्य रात्री उदगाव येथील ओढ्यावर पावसाचे पाणी आल्याने सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जयसिंगपूर उदगाव मार्गे असलेल्या मुख्य महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर सांगली कोल्हापूर जयसिंगपूर मार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.
अशातच सोमवारी रात्री अकराच्या सुमारास उदगाव येथील करपूस कल्पवृक्ष गार्डन जवळ सांगली कोल्हापूर महामार्गावर भले मोठे झाड पडल्याने सांगली कोल्हापूर दरम्यानची सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी दिवसभर बायपास वर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. आता मुख्य महामार्गावर भले मोठे झाड पडल्याने सांगली कोल्हापूर मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. या वाहतूक ठप्प मध्ये एसटी बसेस ट्रक चार चाकी वाहने दुचाकी अशी हजारे वाहने अडकून राहिले होते रात्री उशिरा जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी धाव घेऊन झाड हटवण्यासाठी साहित्याचे काम सुरू होते.