वेंगुर्ले : महाराष्ट्र रायफल असो. तर्फे 5 ते 9 जून या कालवधीत 28 वी कॅप्टन एस.जे. इझेकियल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ले येथील दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर आणि गौरव दत्तप्रसाद आजगांवकर या पितापुत्रांनी यश संपादन केले. या दोघांची प्रि नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, धुळे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नेमबाजांनी सहभाग घेतला होता. वेंगुर्ले येथील दत्तप्रसाद आजगांवकर यांनी 50 मीटर 0.22 पीप साईड रायफल प्रोन प्रकारात 600 पैकी 538 गुण प्राप्त करीत राज्यात आठवी रँक प्राप्त केली.
तर गौरव आजगांवकर याने 10 मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात 400 पैकी 381 गुणांसह राज्यात दहावी रँक प्राप्त केली. या दोघांना प्रशिक्षक अरुण वारेशी (मुंबई) व कांचन उपरकर (वेंगुर्ला) यांचे मार्गदर्शन लाभले.