सावंतवाडी : राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शनिवारी मुंबईतील वरळी डोममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि दोघांनीही दमदार भाषणे केली. या ऐतिहासिक भेटीनंतर सावंतवाडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर समाधान व्यक्त केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, आज महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. ही महाराष्ट्राच्या विकासाची नांदी आहे आणि याच एकजुटीसाठी आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत.
मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर म्हणाले, मुंबईत आज मराठी माणूस एकत्र आला आणि त्याचीच झलक सिंधुदुर्गातही दिसून आली आहे. मराठी माणसाच्या वाटेला कोणी गेल्यास तो कसा पेटून उठतो, हे आज सर्वांना समजले असेल. ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी या भेटीला मराठी जनतेसाठी आनंदाचा क्षण म्हटले. ते म्हणाले, राज्यात बाहेरच्या शक्ती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना, ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी मनाचा विचार केला आहे.
या जल्लोषामध्ये ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष अॅड. राजू कासकर, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आशिष सुभेदार, राजन पवार, रमेश गावकर, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, मिलिंद देसाई, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, सिद्धेश आकेरकर, दिनेश मुळीक, श्रीराम सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते.