कणकवली ः सिंधुदुर्गात पावसाळ्यात काही ठिकाणी भुस्खलनाचे तर काही ठिकाणी डोंगर कडे ढासळण्याचे प्रकार अलिकडच्या काही वर्षात सुरू झाले आहेत. अलिकडेच काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास 300 मीटरचा हा ढासळलेला भाग आहे. दोन वर्षापूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे डोंगर कोसळून एक घर जमिनदोस्त होत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेने नाटळसह सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
नाटळ गावचा पूर्वेकडील भाग सह्याद्रीच्या कड्यांनी व्यापलेला आहे. या कड्यातील सुमारे 300 मीटरचा बुरूज अलिकडेच काही दिवसापूर्वी ढासळला. सुदैवाने तो निर्जनस्थळी कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाटळसह परिसरातील गावांच्या सह्याद्री पट्ट्यात डोंगराच्या पायथ्याशी मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे अशा घटना घडल्या की, मनात चिंतेची पाल चुकचुकते. दरवर्षी जिल्ह्यात कोठे ना कोठे अशा घटना घडतात. तरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सर्व गावांनी याची दखल घेऊन सरकार आणि पर्यावरण खात्याचे लक्ष वेधण्याची गरज आहे.