नाटे : राजापूर तालुक्यातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरूवात केली असून, यापुढे येणार्या प्रत्येक प्रकल्पाचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतरच त्यांला मंजुरी दिली जाईल. तालुक्यात होऊ घतलेल्या मायनिंग प्रकल्पापासून पर्यावरणाला जर धोका निर्माण होत असेल तो रद्द करण्याची मागणी केली असल्याचे सांगताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका राजापुरात आयोजीत कार्यकमात केली. अकार्यक्षम प्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख करताना कोणतेही पद नसतानाही किरण सामंतांनी विकासाचा धडाका लावला आहे तर येथील पतिनिधी सध्या मताचा कटोरा घेऊन जोगवा माग असल्याची टीका राजापुरात आयोजित उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारत भूमिपूजन कार्यकम प्रसंगी केली.
राजापूर व लांजा तालुक्यासाठी स्वतंत्र्य असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी राजापुरात उभारण्यात येणार्या इमारतीचे भूमिपूजन ना. उदय सामंत यांच्या हस्ते तहसीलदार कार्यालय आवारातील अल्पबचत इमारत येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर शिवसेना नेते किरण सामंत, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी श्री. बर्गे, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, उपविभागीय अधिकारी डॉ. जास्मीन, राजापूर तहसीलदार विकास गमरे, लांजा तहसीलदार श्रीमती प्रियंका ढोले, पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण, रत्नागिरी जिल्हा बँक संचालक अमजद बोरकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दीपक नागले, अर्बन बँक संचालक संजय ओगले आदी मान्यवर उपस्थित होते.