अवकाळीचा आंबा मोहोरावर होणार परिणाम  
रत्नागिरी

Ratnagiri News : अवकाळीचा आंबा मोहोरावर होणार परिणाम

यावर्षीच्या आंबा हंगामाला, बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसणार

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : गणेशोत्सवानंतर पुन्हा सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणार्‍या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. परतीच्या आणि अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहिल्यास यावर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यावर्षीच्या आंबा हंगामाला आणि बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे.

यावर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये आणि त्यापूर्वी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला तरी आंब्याच्याद़ृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. मात्र गणेशोत्सवानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या वरूणराजा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मागे फिरला आहे. त्यातून, गेल्या काही दिवसांपासून अवेळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका भातकापणीच्या कामांना जसा बसत आहे तसाच आंब्यालाही बसत आहे.

पावसाने सातत्य राखल्यास मोहोरोपूर्वी आंब्यांच्या झाडांना आलेली किंवा येत असलेली पालवी कुजण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणार्‍या आंब्याच्या मोहोरावर होऊन मोहोर येण्याचा हंगाम नेहमीच्या तुलनेमध्ये पंधरा दिवस उशीरा लांबणीवर पडण्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. मोहोर लांबणीवर पडल्यास साहजिकच, त्याचा आंबा व्यवसायातून होणार्‍या उलाढालीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT