रत्नागिरी ः शहरातील घरफोडीचे सत्र सुरूच असून, सलग तिसऱ्या रात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटे 3 वा. सुमारास शहरातील अभ्युदयनगर परिसरातील नूतननगर येथील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख 50 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
याबाबत सायली झगडे (50, रा. नूतननगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी पहाटे अज्ञाताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरातील बेडरुममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील सोन्याचे कानातले व रोख 50 हजार रुपये असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल लांबवला. शुक्रवारी सकाळी सायली झगडे यांना बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त आढळले. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
या प्रकरणी अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी करत आहेत. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील छत्रपतीनगर येथील बंद बंगल्याची रेकी करून चोरट्यांनी तो फोडला. यामध्ये सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रोकड चोरट्यांनी लांबवली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी शहराजवळील साईनगर येथे तीन बंद घरे फोडली. एका रात्रीत झालेल्या या तीन घरफोड्यांमध्ये कोणती मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे कोणी तक्रार केलेली नव्हती. दरम्यान, शहर पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत असून शहरात झालेल्या घरफोडी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी साळवी स्टॉप,नाचणे, मारुतीमंदिर येथील सीसीटिव्हींचे फूटेज तपासले जात आहेत. त्याआधारे आपण लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळून असा विश्वास शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांंनी व्यक्त केला आहे.
नागरिकांनी आपले घर जास्त काळ बंद ठेवू नये, बाहेरगावी गात असताना दागिने आणि रोख रक्कम घरात ठेवू नये. तसेच घराबाहेर चांगल्या प्रतिचा सीसीटीव्ही लावावा. घरातील दिवे बंद करु नयेत आणि बाहेरगावी जात असताना आपल्या शेजाऱ्यांना तसेच नातेवाईकांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करावी, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.