मुंबई-गोवा महामार्ग 
रत्नागिरी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलला!

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी येण्यासाठी चाकरमान्यांची मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वेने रीघ लागली आहे. गुरुवारी (दि. 5) दिवसभर महामार्ग वाहनांनी हाऊसफुल्ल झाला होता. याशिवाय कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या गर्दीने खचाखच भरून गेल्या होत्या. त्यामुळे एसटी स्थानक व रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

एसटी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतल्याची घोषणा होताच मुंबई, पुणेहून चाकरमान्यांनी भरलेल्या एसटी गाड्या कोकणच्या दिशेने धावल्या आणि गुरुवारी सकाळी या गाड्या कोकणामध्ये दाखल झाल्या. गाडीला समोरच्या बाजूने लावलेले बॅनर, झेंडे, हार आणि गणरायाचा जयघोष करीत चाकरमानी गावागावांत दाखल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचा सामना करीत चाकरमानी एसटीने गावात दाखल झाले आहेत. याबरोबरच मोठ्या प्रमाणात खासगी वाहनेदेखील कोकणात दाखल होत आहेत. या शिवाय खासगी आराम बसची संख्यादेखील मोठी आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चाकरमानी दाखल होत आहेत. या शिवाय कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या गाड्याही चाकरमान्यांनी फुलल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी आणि चिपळूणसाठी गणपती स्पेशल ट्रेन सोडली आहे. या शिवाय अन्य फेस्टिव्हल ट्रेनदेखील या मार्गावर धावत आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गाड्या काही ठिकाणी उशिराने देखील धावत आहेत. महामार्गालगतच्या सर्वच एस.टी. डेपोंमध्ये चाकरमान्यांची मोठी गर्दी आहे. दोन दिवस बंद असलेला एस.टी.चा कारभार पुन्हा गर्दीने फुलला असून एस.टी. आगारात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.

चिपळुणातील शिवाजीनगर तसेच मध्यवर्ती बसस्थानकात गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर प्रत्येक मिनिटाला एक एस.टी. बस धावत आहे. या शिवाय खासगी आराम बस, जीप, कार आणि रेल्वेने देखील मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. आणखी दोन दिवस मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल होणार असून यामुळे कोकणातील प्रत्येक गाव आता जागे झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT