पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने नांदुरमधमेश्वर बंधार्यातून गेल्या आठवड्यात गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी आज येथे येऊन पोहोचले. गोदामाई दुथडी भरून वाहती झाली असून यामुळे नदी काठावरील गावांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसानेही परिसरात दमदार हजेरी लावल्याने शेतकर्यांत समाधान व्यक्त केले आहे.
गोदापात्रात यंदा काही प्रमाणात पाणी असल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गेल्या बुधवारी गोदावरीत आठशे क्युसेकने पाणी सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी येथे पोहोचले. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहती झाली.
यावर अवलंबून असलेल्या पाणी योजना जनावरांच्या पाण्याचा तसेच खरिप पिकांना पाणी देण्याचा प्रश्न मिटला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पेरण्या खोळंबल्या असताना सोमवारी परिसरात पावसाने तासभर हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसाने पेरण्या होतील असे शेतकर्यांनी सांगितले.
गोदावरीतून बेसुमार सुरू असलेल्या वाळू उपशास अचानक आलेल्या पाण्यामुळे ब्रेक लागलेला दिसत आहे. नदीला आलेले पाणी आणि पुढील काही दिवसांत पाऊस होणार असल्याने वाळूतस्करांनी वाळू साठे केले असल्याचे बोलले जात तरीही महसूल, पोलिस प्रशासन कोणतेही कारवाई करताना दिसत नसल्याने शेतकर्यांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.