शिक्षक मोर्चा  pudhari
अहमदनगर

आम्हाला शिकवू द्या; गुरुजींचा उद्या ‘आक्रोश’!

पुढारी वृत्तसेवा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आम्हाला शिकवू द्या, असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे देण्यात आली.

सततच्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या वारंवारीतेमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे. 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणारे प्राथमिक शिक्षक सामूहिक रजा घेऊन 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आहेत.

सध्या राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत आणि शिक्षकांना वेठबिगारासारखे राबवले जात आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच शिल्लक नाही. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना 1982 सालची जुनी पेन्शन योजना लागू करणे, शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतींमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भरच पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, 10-20-30 वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू कराणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक सामूहिक रजेवर जाऊन बुधवार 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत. मोठ्या संख्येने अन्याय विरुद्ध लढण्यासाठी शिक्षकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या मार्फत करण्यात येत आहे.

‘ते’अध्यादेश रद्द करावे!

कंत्राटी शिक्षक भरती न करता थेट शिक्षक भरती करावी शिक्षण सेवक योजना देखील आता रद्द करण्याची वेळ आली आहे कारण ती देशात इतर राज्यात कुठेच नाही .या व इतर मागण्यांसाठी 25 तारखेला होणार्‍या मोर्चा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या मोर्चात सहभागी व्हावे जिल्हा समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT