मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साठी सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनंतर विविध जिल्ह्यांत स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून नव्या नियमांची भर घातली जात आहे.
या नियमांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून नव्या नियमांची डोकेदुखी थांबवण्याची मागणी केली आहे.
समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहिबावकर म्हणाले की, मुंबईमध्ये महापालिकेच्या वॉर्ड पातळीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वेगवेगळ्या नियमावली पुढे केल्या जात आहेत. याशिवाय पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्रपणे मंडळांकडून कठोर नियमावलीचे पालन करण्यासाठीचे हमीपत्र भरून घेतले जात आहे. या हमीपत्रात राज्य सरकारच्या नियमांशिवाय नव्या जाचक नियमांचा समावेश केलेला आहे.
मुंबई महापालिकेने व्यावसायिक जाहिरातींना परवानगी दिल्यानंतरही वॉर्ड स्तरावर ती नाकारण्यात येत आहे. एकीकडे काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना मंडप उभारणी व इतर कामांसाठी पुरेसा वेळ नाही. अशा परिस्थितीत मंडळाच्या पदाधिकार्यांची छळवणूक थांबवण्याची मागणी समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, शासनाकडून गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपक वापरण्याबाबत स्पष्टता दिलेली नसल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे. शासनाने काही नियमांत स्पष्टता द्यावी, अशी मागणी या निवेदनात कृती समितीने केली आहे.
संभ्रमता असलेल्या नियमांमध्ये फक्त ऑनलाईन दर्शन द्यायचे की सुरक्षित अंतर ठेवून दर्शन द्यायचे?, व्यावसायिक जाहिरातींना मनपाची परवानगी असताना पोलिसांचा विरोध का?, ठराविक पोलीस ठाण्यांमध्ये वेगळे हमीपत्र भरून घेण्याची गरज काय?, हार, फुले व प्रसाद आणण्यासाठी परवानगी आहे का?, विसर्जनासाठी 10 भक्तांना मनपाची परवानगी असताना पोलिसांचा विरोध का? अशा विविध प्रश्नांचा समावेश आहे. त्याची उत्तरे शासनाने सुधारित परिपत्रक काढून द्यावीत, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.
गणेश मंडळांसमोरील अडचणी
मुंबई उपनगरातील साकीनाका पोलिसांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्वतंत्र हमीपत्र भरण्यास सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गणेशमूर्तीला हार, फुले अर्पण करता येणार नसल्याचे नमूद केलेले आहे.
धारावी पोलीस ठाण्याकडून मनपाने दिलेल्या परवानगीनंतरही धारावी परिसरात मंडप उभारू दिले जात नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे धारावीसाठी वेगळा नियम असल्याचा दावा पोलीस करत असून उत्सव साजरा करू नका, असेही पोलिसांना सांगितल्याचा आरोप समन्वय समितीने केला आहे.
मुलुंड येथील पालिकेच्या टी वॉर्ड कार्यालयात सार्वजनिक मंडळांना जाहिराती लावण्यास मनाई करण्यात येत आहे. तसे हमीपत्र वॉर्ड कार्यालय भरून घेत असून या हमीपत्रात जाहिरात लावल्यास मनपा दंड आकारेल, असेही लिहून घेतले जात आहे.
मनपाच्या आर नॉर्थ वॉर्डमध्येही एकाही गणेशोत्सव मंडळास परवानगी दिलेली नाही.