कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : कण्हेर परिसरात दमदार पाऊस कोसळत असून जनजीवन चिंब झाले आहे. दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. भर पावसात अंगावर खोळ घेऊन भाताची रोपे वाफ्यातून काढण्यासह लागण सुरू आहे. पाऊस, गारवा अन् चिखलाचा राडारोडा या वातावरणातच शेतकरी कामात मग्न झाला आहे.
यंदा मान्सून महिनाभर उशिरा आला असला तरी सध्या पावसाने संततधार व दमदार हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिसरात पेरणी व टोकणी केलेल्या भात रोपे व सोयाबीनसारख्या मुख्य पिकांना हा पाऊस उपयोगी ठरला आहे.
या परिसरातील शेतकरी भाताचे उत्पादन वेगवेगळ्या पद्धतीने घेतात.गत महिन्यात मृग नक्षत्रात अनेक शेतकर्यांनी भात लावण्यासाठी तरव्यांचे वाफे टाकले होते. सध्या या तरव्यातील वाफे चांगले तयार झाल्याने भाताची रोपे काढून जुड्या बनवल्या जात आहेत. भात पिकासाठी काही शेतकरी पेरणी, तसेच लागण करून भात पीक घेतात. त्या तुलनेत भात लागण करून भाताचे उत्पादन घेतले जाणारे क्षेत्र जास्त आहे. शेतात भरपूर पाणी घेऊन त्यामध्ये बैलांच्या सहाय्याने चिखल करून भात लागण केली जाते. भात खचरातील चिखलामध्ये भाताची रोपे ओळीने लावली जात आहेत.
शेतकरी एकजुटीने करतोय कामे….
भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस शेतातच मावळत आहे. भर पावसात अंगावर खोळ घेऊन भाताची रोपे वाफ्यातून काढण्यासह लागण सुरू आहे. सध्या अनुकूल पावसामुळे भात लावणीस शेतकर्यांनी कंबर कसली असून कामात उत्साह दिसून येत आहे. दमदार पाऊस,गारवा व शेतातील चिखलामध्ये होणारा राडारोडा याची पर्वा न करता शेतकरी लोक एकमेकांना मदत करून कामे करताना दिसत आहेत. शेतातील कामात मग्न होऊन काबाडकष्ट करताना दिसत आहेत.