वारणावती : हिरवा गर्द निसर्ग.. घनदाट जंगलातून नागमोडी गेलेली पायवाट, झिम्माड सरी, थंडगार वारा, हिरव्या कुरणांवर ताव मारणार्या गाई अन् वासरे, अधून मधून ऐकू येणारा किलबिलाट, केकारव, खळखळणारे निर्झर आणि समोरच दुग्ध वर्षाव करत सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा नयनरम उखळूचा धबधबा डोळ्यात साठवून ठेवावं असं हे दृश्य पर्यटकांना सध्या साद घालतय!
चांदोली धरणापासून अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतरावर असणार्या सह्याद्रीच्या कुशीतील हा धबधबा अत्यंत मनमोहक आहे. चांदोली परिसरात गेल्या आठ दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे तो पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. त्यामुळे त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. हा धबधबा घनदाट जंगलात असल्यामुळे तो पर्यटक तसेच प्रसिद्धीपासून वंचित होता. मात्र पाच-सहा वर्षात प्रसिद्धी मिळाल्यामुळे पर्यटकांना तो माहीत झाला. अनेक पर्यटक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र खडतर प्रवासामुळे अनेक पर्यटक अर्ध्या वाटेतून परत येतात.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी दोन पर्यटक पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले. जवळपास मदत नसल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित यंत्रणेने धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा केवळ मार्ग जरी केला तरी शेकडो पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील.
अत्यंत नयनरम्य असणारा हा धबधबा पर्यटकांपासून मात्र वंचित आहे. याला कारण म्हणजे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही. कुणी जायचा प्रयत्न केला तर घनदाट जंगलामुळे मार्ग सापडत नाही. त्यातूनही काही हौशी पर्यटक चार-पाच किलोमीटरचा खडतर प्रवास करत इथपर्यंत पोहोचतात. अंगावर शहारे आणणारे येथील दृश्य पाहिल्यानंतर खडतर प्रवास करून आलेला थकवा क्षणात नाहीसा झाल्याचे अनुभव अनेक पर्यटक सांगतात.
हेही वाचा :