पुढारी ऑनलाईन डेस्क : बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या आणि शेवटच्या टी २० सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. सूर्यकुमारने ५५ चेंडूंत १४ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ११७ धावांची अप्रतिम खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने फलंदाजांच्या टी २० क्रमवारीत (ICC T20I Ranking) पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. या टी २० क्रमवारीत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच (ICC) टी २० खेळाडूंची ताजी क्रमवारी (ICC T20I Ranking) जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये सूर्यकुमार यादवने ४४ अंकानी झेप घेतली आहे. सुर्यकुमार आता टॉप ५ मध्ये येवून पोहोचला आहे. सध्या सूर्याने ७३२ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे.
बाबर आझम प्रथम तर रिजवान द्वितीय क्रमांकावर
आयसीसीने नुकतीच टी २० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर दीर्घकाळापासून टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या त्याचे आयसीसी रेटिंग ८१८ आहे, तर त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग ८९६ इतकी आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याचे ७९४ गुण आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्कराम तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनलाही पाच स्थानांचा फायदा झाला असून तो टॉप १० मध्ये पोहोचला आहे. पूरन सध्या आठव्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियातील खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर विराट, रोहित, धवन सारखा एकही सिनियर खेळाडू टॉपटेनमध्ये नाहीत. याउलट युवा फलंदाज सुर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर आहे.
बुमराह बनला 'नंबर १'
बुमराहने आयसीसी वनडे गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. टॉप १० मध्ये स्थान मिळविणारा बुमराह एकमेव भारतीय गोलंदाज आहे. भारताचा वेगवान व प्रमुख गोलंदाज बुमराह हा फेब्रुवारी २०२० नंतर प्रथम क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकले. फेब्रुवारी २०२० पूर्वी बुमराह तब्बल ७३० दिवस पहिल्या स्थानी विराजमान होता. अव्वल स्थानी पोहोचणारा बुमराह हा कपिल देव यांच्यानंतर दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यात ३ विकेटस् घेणार्या भारताच्या मोहम्मद शमीनेही २३ व्या स्थानी झेप घेतली आहे.