शिर्डी : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने 'माझी वसुंधरा' हे अभियान सुरू केले होते, या अभियामध्ये शिर्डी नगर परिषदेने उत्कृष्ट काम केले असून प्रथम क्रमांकाची माळ शिर्डीनगरीच्या गळ्यात पडली आहे. नुकतेच प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नगर परिषदेचे प्रशासक गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना देण्यात आला.
आकाश, अग्नी, जल, वायू, पृथ्वी या पंचतत्त्वाची काळजी घेण्यात यावी. यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती यांच्यासाठी 'माझी वसुंधरा' ही 5 हजार 500 गुणांची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यामध्ये शिर्डी नगर परिषदेने बाजी मारली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून शिर्डी नगर परिषदेस किमान 5 कोंटीचे बक्षीस मिळणार आहे.
यापूर्वी पहिली 'माझी वसुंधरा' स्पर्धा ही घेण्यात आली होती. त्यामध्ये शिर्डी नगर पंचायतीने बाजी मारली होती. या पुरस्कारापोटी नगर पंचायतीस 3 कोटी रुपये निधी मिळाले होते. त्यामाध्यमातून सौर उर्जाचा प्रकल्प उभारण्यात आला. त्यामुळे आजमितीस नगर परिषदेचे सुमारे तीन लाख रुपये मासिक वीज बिल कमी झाले आहे, तर शहरातील सौंदर्यकरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून मिळणार्या रकमेतून शिर्डीच्या शहराच्या विकासाला आणि सौंदर्यकरणाला नक्कीच चालना मिळणार आहे. असेही डोईफोडे म्हणाले. एक काळ असा होता की, शिर्डीत येणार्या भाविकांना नाकाला रुमाल लावून जावं लागत होत. परंतु आता परिस्थिती बदलली आहे.